सोमवार, ९ मे, २०२२

समतेचे घोळ

समतेचे मूल्य स्वीकारून जे अनेक घोळ झालेत त्यातील काही-

१) भजन आणि लावणी एकाच पातळीवर आणून ठेवले. दोन्ही गोष्टी समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत हे निश्चित. पण म्हणून त्यांचं स्थान, परिणाम, प्रमाण एकसारखे नाहीत. फडावर भजन आणि मंदिरात लावणी केविलवाणीच ठरणार. आम्ही दोन्हीला केवीलवाणं करून ठेवलं. दुसरीकडे भजन आणि लावणी दोन्हीला स्थान देणारं, पण भजनाकडे ओढ लागेल अशा रीतीने त्यांना गोंजारणारं घर आम्ही विस्कटून टाकलं.

२) शास्त्रीय संगीत आणि कानाचे पडदे फाडून टाकणारे संगीत यांनाही एकाच पातळीवर आणून ठेवले. ऋतू आणि वेळेनुसार मानवी अथवा निसर्गाच्या भावभावना, चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या संगीताची जादू आम्ही घालवली, अन त्याच वेळेस शारीरिक अन मानसिक भ्रष्टता, विस्कळीतपणा आणि त्रास जन्माला घालणाऱ्या संगीताला डोक्यावर चढवले. हे तर दूर, या समतेच्या मूल्याने न्यायचिंतनाला एवढे पंगु बनवले की, मेंदूच्या नसा फाडून टाकणाऱ्या डीजेला आळा घालण्याच्या प्रयत्नात शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना कात्री लावली. मुळातच रात्रीची गती-स्थिती-प्रकृती लक्षात घेऊन विकसित झालेल्या शास्त्रीय संगीताचे रात्रकालीन संदर्भ दुर्लक्षून त्याची अभिव्यक्ती आणि विकास दोन्हीही खुंटवून टाकले.

३) धर्माच्या क्षेत्रातही या समता मूल्याने धुमाकूळ घालून धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या प्रयोजनालाच सुरुंग लावला. पंथ संप्रदायांचा विकास आणि सुधारणा बाधित केल्या. `सगळे धर्म समान' हे आध्यात्मिक अर्थाचे आणि अंतिम हेतूच्या दृष्टीने सापेक्ष सत्य असलेले विधान मूल्य म्हणून स्वीकारल्याने; पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती, पूजा पद्धती, त्यांचे तत्वज्ञान, त्यामागील तर्क इत्यादीची सापेक्ष, निरपेक्ष, तौलनिक चर्चा त्याज्य ठरली. मग हिंदुस्थानातील धर्म, पंथ हिंदुस्थानबाहेरील धर्म, पंथापेक्षा वेगळे आहेत हे मानण्याचे कारण उरले नाही. या वेगळ्या धर्म पंथांनी, त्यांच्या व्यवहारपद्धतींनी, त्यांच्या तत्त्वज्ञानानी मानवी विकासाला, सभ्यतेला लावलेली वेगळी वळणे विचारांच्या कक्षेच्या बाहेर गेली. भारताबाहेरील सगळेच्या सगळे पंथ, संप्रदाय (ईश्वर मानणारे अथवा ईश्वर न मानणारे) हे जडवादी आहेत आणि भारतातील जडवादी समजले जाणारे पंथ, संप्रदाय चैतन्यवादी आहेत हे लक्षात घेण्याची गरज उरली नाही. त्यांचे होणारे वेगवेगळे परिणाम लक्षात घेण्याची गरज उरली नाही. यामुळे मूलत: चैतन्यवादी असणारी भारतीय भक्तीधारा हळूहळू जडवादी होऊ लागल्याची चिंता करण्याची गरज उरली नाही. आत्मिक उन्नतीच्या गरजेतून विकसित होणाऱ्या पंथ, संप्रदायांची वाढ आणि परिणामी आत्मिक विकास धुळीस मिळवला. बाह्य आचार व्यवहारात समानतेची मागणी करतानाच, विविधता आणि त्याचा उपयोग नजरेआड झाला.

परिणामी, जीवनाची सार्वत्रिक परवड झाली.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १० मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा