बुधवार, २५ मे, २०२२

लोकशाहीची भयाण शोकांतिका

द्वेष हा त्याज्य म्हणजे त्याज्यच आहे. कोणतेही कारण त्याचे समर्थन करू शकत नाही. याचा अर्थ द्वेष या जगातून संपून जाईल या भ्रमात मी नाही. अगदी माझ्या मनात सुद्धा द्वेषाची एखादी लहर येऊ शकते. परंतु त्याचे समर्थन नाही होऊ शकत. सत्तेची मग्रुरी किंवा सत्ता विरहाचा पोटशूळ, अन्यायग्रस्ततेचे वास्तव किंवा अन्यायग्रस्ततेचे तुणतुणे; अशा कोणत्याही परिस्थितीत द्वेषाचे समर्थन होऊ शकत नाही. काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अपघातानंतर जी द्वेषाची कावीळ पाहायला मिळाली ती निषेधार्ह आहे.

मात्र, ही द्वेषाची कावीळ षंढपणाने अन थंडपणाने नजरेआड करणारे अधिक निषेधार्ह अन घातक आहेत. मूळ कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या अनेक रंगछटा, कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, लोहियावादी, मानवतावादी, स्त्रीवादी, पुरोगामी; या सगळ्या टोळ्या; तसेच यापैकी कोणत्याही टोळीत सामील नसलेला आणि स्वत: विचार करणारा मोठा समाज; ज्या वेगवेगळ्या कारणांनी मुग गिळून बसतो, स्पष्ट बोलण्याचे, लिहिण्याचे टाळतो; ते अधिक आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. दलित, बहुजन, मागास, महिला, आदिवासी इत्यादी विशेषणे लावणाऱ्या सामान्य माणसाला द्वेष मान्य आहे का? नसेल, तर तो अशा वेळी ठाम व स्पष्ट मतप्रदर्शन का करीत नाही. चांगुलपणा आणि नीतिमत्तेच्या गोष्टी करण्याचा सारा नैतिक अधिकार या लोकांनी गमावला आहे.

खुद्द भाजप आणि अन्य राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती आणि शक्ती यांचीही मर्यादा अशा वेळी उघड होते. त्यांनीही आपल्या भूमिकांचा आणि धोरणांचा पुनर्विचार करायला हवा. आज भाजपकडे सगळ्या समाजगटांचे मोठे संख्याबळ आहे. परंतु कोणीही कोणत्याही कारणाने कोणाचा द्वेष करू नये, करता कामा नये; असे बोलण्याची त्यांचीही हिंमत नाही. त्यांच्याही भूमिका `कोणाला काय वाटेल' या राजकीय हिशेबातच घुटमळत राहतात. दलित, बहुजन, आदिवासी अशा अनेक गटातटांनी सवर्ण अन ब्राम्हण द्वेषातून बाहेर यावे हे आवाहन का करता येऊ नये? का केले जाऊ नये? सामान्य मानवी सद्गुणाला सत्तेचे बटिक व्हावे लागणे ही लोकशाहीची भयाण शोकांतिका आहे.

- श्रीपाद कोठे

२६ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा