गुरुवार, ३१ मार्च, २०२२

आम्ही हे स्वीकारू?

तंबाखू उत्पादने हा अलीकडे पुन्हा चर्चेत आलेला विषय. त्या सवयीने असे होते, तसे होते, इतके मरतात वगैरे सुरु असते. काल कोणते तरी सर्वेक्षण आले की, सिगारेट पिण्याने कर्करोग होतो हे खोटे आहे. खरं खोटं काय असेल ते असो. पण कधी कधी मनात प्रश्न येतो या सगळ्याशी सरकारचा काय संबंध? जागृती, प्रचार-प्रसार, नुकसानभरपाई, कज्जेदलाली; यासारख्या गोष्टींवर सरकारे किती वेळ, पैसा, मनुष्यबळ, साधने वगैरे वाया घालवतात. हे सगळे थांबायला नको? समाजाची, प्रत्येक व्यक्तीची काही जबाबदारी असते की नाही? तंबाखू सारखे प्रश्न त्यांचे त्यांनी पाहून घ्यावेत. सरकारने सरळ सांगून टाकायला हवं की, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. कोणी तंबाखू खाऊन किंवा ओढून मेला तर त्याची जबाबदारी त्याची वा संबंधितांची. सगळ्यांच्या सगळ्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे; अन त्या साऱ्याचे परिणाम यांच्याशी सरकारचा काय संबंध? अशा अनेक गोष्टींची यादी करता येईल, नव्हे तशी ती करून सरकारने हे जाहीर करावे की, याच्याशी आमचा संबंध नाही. हेल्मेट हा असाच एक विषय. हेल्मेट नावाची एक वस्तू आहे. ज्याला वाटेल तो वापरेल, ज्याला नाही वापरावेसे वाटणार तो नाही वापरणार. मरेल तर मरेल. हां, सुव्यवस्थेसाठी गाड्यांचे वेग नियंत्रण, वाहने कुठल्या बाजूने चालवावी, कशी कुठे थांबवावी वगैरे गोष्टी ठरवाव्या आणि त्यात कोणी चुकला वा जाणूनबुजून कोणी त्यात हयगय केली तर नियमानुसार त्याला शासन करावे. पण हेल्मेटसक्ती सुव्यवस्थेत बसत नाही. पण सरकार इतके स्पष्ट ठेमेठोकपणे काम करील का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बावळटपणा, बेजबाबदारपणा यात आघाडीवर असणारा आणि सतत कुणावर वा कशावर अवलंबून राहण्याची सवय असलेला समाज हे स्वीकारेल का?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा