मंगळवार, २९ मार्च, २०२२

पुष्कळांना आवडणार नाही तरीही...

मोठ्या प्रमाणात कामगारांचे पलायन सुरू आहे. त्यावर बरीच आक्रस्ताळी, कडवट टीका होते आहे. हे चूक आहे. ज्या पद्धतीने हे पलायन होते आहे त्याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. परंतु त्यावर काही बोलण्यापूर्वी क्षणभर हा विचार करून पहावा की, मी माझ्या कुटुंबासह एखाद्या unforeseen विपत्तीत सापडलो तर? त्यातही एकीकडे जीवाची भीती. अशा स्थितीत आम्ही काय करू? ते जाऊ द्या. सध्याचे २१ दिवसांचे क्वारंटाईन संपेपर्यंत तरी आमचे मानसिक स्वास्थ्य अगदी ठणठणीत राहील याची खात्री किती जण देऊ शकतील? हा काळ समजा (प्रभू करो तसे न होवो) वाढवावा लागला तर किती जणांचे डोके, मन शांत राहील. बाकी आपली परिस्थिती, आपली साधने, आपली वाढ, आपले बुद्ध्यांक आणि भावनांक या गोष्टी आहेतच. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर सुद्धा एक तर्क करता येईल की, त्यांच्या भल्यासाठीच आम्ही म्हणतो आहे नं? हा तर्क आहे तर बरोबर पण कोणाच्या भल्यासाठीही आपण आपली मानवीय सीमा सोडावी का? अन त्यातही आपल्याला प्रत्यक्ष काहीही करावयाचे नसताना. त्यामुळे हा अनावश्यक आक्रस्ताळेपणा योग्य म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३० मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा