शनिवार, १९ मार्च, २०२२

चोराच्या उलट्या...

दोन दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी नागपूरला येऊन व्याख्यान देऊन गेले. वास्तविक उत्तर प्रदेशातल्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतांची चार आकडी संख्याही गाठता न आलेल्या पक्षाच्या नेत्याची दखल कोणी आणि का घ्यावी? नाहीच घेणार कोणी. मात्र असे बेदखल होणे चालणार नाही ना? मग मुद्दा शोधण्यात आला- नागपूर विद्यापीठाने निमंत्रण दिले असतानाही कार्यक्रमच रद्द केल्याचे. असे कार्यक्रम रद्द होणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा अनेक कार्यक्रम रद्द होत असतात. त्यात एवढे issue करण्यासारखे काही नसते. अन तो फार मोठा issue असला तरीही तो विद्यापीठापुरता मर्यादित होता. पण मार्क्सवादी पक्ष आणि त्याचे माध्यमातील पाठीराखे यांनी तर कोणत्याही गोष्टीचे गुह्य प्रकट करण्याची भीष्म प्रतिज्ञाच केली आहे ना? झाले. लगोलग आरोप, बातम्या तयार झाल्या. काय तर म्हणे- रा. स्व. संघाने येचुरी यांचे व्याख्यान रद्द करण्यासाठी विद्यापीठावर दबाव टाकला. यापेक्षा हास्यास्पद दुसरे काय असू शकेल? ज्या पक्षाला हजारभर मते मिळवता येत नाहीत त्या पक्षाकडे अन त्याच्या नेत्यांकडे रा. स्व. संघ लक्ष देईल का? संघ बाकी काहीही असू शकेल पण हिशेबीपणात पक्का आहे. विरोधकसुद्धा याची खात्री देतात. या अगदीच निरर्थक आणि क्षुल्लक व्याख्यानासाठी महालच्या संघ मुख्यालयातून काही हालचाली होतील असं समजणं अन तसे आरोप करणं बालिशपणाच्याही पलीकडील आहे. आता तर स्थिती अशी आहे की, कम्युनिस्ट पक्ष आणि लोकांकडे नजर वळवण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या दुर्दैवाचे खापर फोडायला त्यांना संघ बरा वाटतो, एवढाच त्याचा अर्थ.

बरे विद्यापीठातील व्याख्यान रद्द झाले तर झाले. तसेही चारदोन डोकी आणि वृत्तपत्रातील बातम्या यापलीकडे त्या व्याख्यानातून काय साधले जाणार होते? त्यापेक्षा ते रद्द झाल्याने थोडी तरी चर्चा झाली. येचुरींनी डॉ. काणे यांचे आभारच मानायला हवेत. अन्य एका महाविद्यालयाने त्यांना आमंत्रित केले आणि तेथे त्यांचे व्याख्यान झाले. काय बोलले सीताराम येचुरी? भारतात लोकशाही धोक्यात आहे. काहीही जनाधार नसलेले, काहीही सामाजिक contribution नसलेले येचुरी आमंत्रित केले जातात, ते रोखठोकपणे त्यांचे विचार बोलतात आणि तरीही भारतात लोकशाही धोक्यात? असे उफराटे, गाढवाला ताप आणणारे विश्लेषण कम्युनिस्ट सोडून दुसरे कोण करणार? किंवा असेही म्हणता येईल की, कम्युनिस्ट असे नाही तर कसे विश्लेषण करणार? येचुरी यांनी केरळवर बोलणे स्वाभाविकच होते. केरळमध्ये आमचे कार्यकर्ते मारले जात आहेत असा उलटाच आरोप त्यांनी केला. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या याच. केरळात काय सुरु आहे ते सगळ्या जगाला माहीत आहे. त्यांच्या बोलण्यावर कोणीही काडीचाही विश्वास ठेवणार नाही. तरीही त्याची दखल घ्यायची म्हटली तर प्रश्न निर्माण होतो की, केरळात सरकार कुणाचे आहे? तुमचे सरकार असताना तुमचे लोक का मारले जातात? कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असताना त्या घटनांची चौकशी आणि दोषींना सजा असे का होत नाही? स्वत:च्या पक्षाच्या सरकारच्या निष्क्रीयतेकडे दुर्लक्ष करून रुदाली होत देशभर छात्या पिटायच्या हे करुण आहे. कम्युनिस्ट रक्ताला चटावलेले आहेत. अन्यत्र त्यांची उपासमार होत असल्याने केरळात त्यांनी उचल खाल्ली आहे. त्यात मुख्यत: विरोधक टिपले जातात. अन कधीकधी स्वत:च्या शस्त्राने स्वत:चाच घात होतो. त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार कम्युनिस्ट स्वत:च आहेत. सत्ता, संघर्ष, रक्त ही कम्युनिस्टांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. येचुरींच्या `वैश्विक चिंतनातून' ती लक्षणे बटबटीतपणे अधोरेखित झाली आहेत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

२० मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा