सोमवार, २१ मार्च, २०२२

सुखी देशांची यादी

आपल्या विचारवंतांची गंमतच असते. सध्या भारत सुखी/ आनंदी देशांच्या यादीत कितवा आहे याची चर्चा सुरू आहे. आधी कोणत्या स्थानी होता वगैरे थोडं बाजूला ठेवू. पण सध्या असलेलं स्थान फार समाधानकारक नाही. अन स्वाभाविकच सगळ्या गोष्टींसाठी सरकार जबाबदार असते हा सिद्धांत स्वीकारल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे सरकार असेल त्याच्यावर जबाबदारी ढकलली की आपण टवाळीसाठी मोकळे ! भारताचं जे काही स्थान आहे त्याचं विश्लेषण करताना सध्याची जीवन पद्धती, जीवन मूल्ये आणि राजकीय व्यवस्था यांच्याकडे बोट दाखवलं जातं. जीवन पद्धती, जीवन मूल्ये आणि राजकीय व्यवस्था या तीन गोष्टी कारणीभूत आहेत, म्हणजेच त्या त्याज्य आहेत. या तीन गोष्टी ज्यांच्याकडून आमच्या इथे आल्या त्यांनीच तयार केलेला संबंधित अहवाल आहे. गंमत इथे आहे. ज्या गोष्टी सोडून देण्याची गरज आहे त्यांचे जन्मदाते, त्यांचे प्रसारक आणि त्यांचे अनुयायी असलेल्या लोकांचा अहवाल मात्र आम्ही योग्य आणि प्रमाण म्हणून स्वीकारतो. ज्यांनी वाटोळं केलं त्यांचाच शब्द प्रमाण मानतो. हा अंतर्विरोध आहे असंही वाटत नाही. म्हणजे एकीकडे अमक्याला काही समजत नाही म्हणायचे अन त्याचवेळी त्याचे विश्लेषण प्रमाण मानायचे. आमच्या विचारविश्वाची ही दयनीय स्थिती आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा