रविवार, ६ मार्च, २०२२

ढोंगी केजरीवाल

आज सकाळी नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मोठं नाटक केलं. त्यावेळी त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. मोदी कोणत्या विमानाने प्रवास करतात, कोणाच्या विमानाने प्रवास करतात, खाजगी विमानाने प्रवास करतात का? त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च कोण करतं; इत्यादी. आणि संध्याकाळी त्यांनी ट्विट केले की, जयपूरहून ज्या विशेष विमानाने ते आले ते `इंडिया टुडे' या साप्ताहिकाचं विमान असून, त्या साप्ताहिकानेच त्याचा खर्च केला.

केजरीवाल यांचा हा ढोंगीपणा नव्हे तर काय? एकीकडे उद्योगपती, उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील संबंध, प्रसार माध्यमांचे लागेबांधे यावर अनिर्बंध टीका करीत सुटायचे; आपण अशा सुखसुविधा घेणार नाही असे सतत सांगत सुटायचे आणि व्यवहार मात्र पूर्ण उलट. महात्मा गांधींचे नाव घेत ढोंगी व्यवहार करणाऱ्याला काय नाव द्यायचे? महात्माजी किती तत्वनिष्ठ होते? त्यांची प्रार्थनेची वेळ झाली असेल आणि कितीही महत्वाच्या लोकांसोबत बैठक सुरु असेल तरीही ते बैठक थांबवून प्रार्थनेला जात असत. त्यांच्या तत्वनिष्ठेची असंख्य उदाहरणे सांगता येतील. इंडिया टुडेच्या एखाद्या कार्यक्रमाला अरविंद केजरीवाल गेले नसते तर काय जगाचे सगळे व्यवहार ठप्प पडले असते? अहो केजरीवाल, तुमच्या जन्माच्या हजारो वर्षे आधीपासून माणसे समाज म्हणून राहत आली आहेत आणि तुम्ही निघून गेल्यावरही राहणार आहेत. आपणच या जगाचे (किमान देशाचे) सूत्रधार आहोत या भ्रमात राहू नका. आणि तमाशे थांबवा.

- श्रीपाद कोठे

७ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा