बुधवार, २३ मार्च, २०२२

कोरोनाची आर्थिक किंमत

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात आर्थिक किंमत चुकवावी लागेल असेही म्हटले आहे. ही नेमकी किती राहील, कशी राहील, किती काळ राहील हे सगळे हळूहळू स्पष्ट होणारे विषय आहेत. आज, आत्ता, या क्षणी त्याचा सगळा roadmap द्यावा असं कोणाला वाटू शकतं पण ते अशक्य आहे हे समजणं अजिबात अवघड नाही. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचारच नव्हे तर त्याची तयारी सुद्धा नक्कीच सुरू झालेली असणार. हा विश्वास, अविश्वासाचा मुद्दा नाही. कारण त्याला पर्यायच नाही. फक्त या बाबी आम्हाला कळल्या वा कळवल्या नाहीत ही तक्रार असू शकते पण ती योग्य म्हणता येणार नाही.

या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याची जबाबदारी पण सगळ्यांची आहे. सरकार, उद्योग, व्यापार, सामान्य जनता अशा सगळ्यांची ही जबाबदारी आहे. यात प्रत्यक्ष पैशाची व्यवस्था, वितरण इत्यादी जसे राहील; तसेच अपेक्षा, गरजा, उपभोग, साठा, भांबावून न जाणे, attitude, सहकार्य, सवयी या बाबीही येतात. बाकी गोष्टी सगळ्यांनी करावयाच्या आहेत पण पैशाची व्यवस्था सगळे करू शकत नाहीत. सगळे सारख्या प्रमाणात करू शकत नाहीत. मात्र सगळे मिळून करू शकतात. यासाठी केंद्राने पुढाकार घेऊन एक विशेष 'कोरोना सार्वजनिक विश्वस्त निधी' तयार करावा. या संकटासाठी जो task force तयार करण्यात आलेला आहे त्याच्याकडे किंवा वेगळा task force तयार करून त्याकडे ही जबाबदारी देता येईल. ज्यांना ज्यांना जसे शक्य होईल त्यांनी या कोरोना निधीत पैशाचे दान द्यावे. कोटी रुपयात दान देण्याची क्षमता असलेले लोकही देशात आहेत. मानवीय भावनेतून, संवेदनशीलतेतून ते यात आपला वाटा उचलतील असे आवाहन आणि असे वातावरण तयार करावे. आपल्या देशाची, समाजाची ती क्षमता आहे अन परंपराही.

- श्रीपाद कोठे

२४ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा