शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मोदींनी माफी मागावी, पण...

'टाईम' मासिकाच्या ताज्या अंकात मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापल्यानंतर आणि मुख्य म्हणजे त्यातील लेखात नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांची तुलना करून मोदी हे पंतप्रधान पदासाठी अधिक लायक असल्याचे जे मत व्यक्त करण्यात आले आहे त्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पुन्हा एकदा गुजरात दंगली ताज्या होत आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असा सूर आळवला जात आहे. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, एक noble gesture म्हणून जरी मोदींनी उद्या माफी मागितली (त्याची गरज काय? वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवू) तरी आकाशपाताळ एक करून `आपण त्या दंगलींसाठी जबाबदार असल्याची कबुलीच मोदींनी दिली आहे' असा ओरडा सुरु होईल.

पण राजकारणाचा एक भाग म्हणून मोदींनी त्या दंगलींसाठी माफी मागावी, असे मला प्रामाणिकपणे वाटते. फक्त त्यासाठी त्यांनी एक अट घालावी की, `गोध्रासाठी जबाबदार असलेल्यांनी आणि १९४७ साली देशाची फाळणी केल्याबद्दल कॉंग्रेसने आधी माफी मागावी.' हिंदू-मुस्लीम प्रश्न अतिशय जटील आहे. त्याला ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे. अनेक पदर आहेत. अशा प्रश्नांवर wishful thinking किंवा गोड गोड बोलण्याने फार काही साधत नाही. जटील प्रश्नांची बाळबोध उत्तरे शोधणार्या नेत्यांनी आणि स्वनामधन्य विचारवंतांनी हे समजून घ्यायला हवे. अर्थात समजून घेण्याची इच्छा आज किती जणांकडे आहे?

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा