मंगळवार, २२ मार्च, २०२२

झरे मोकळे करण्याची गरज

पुन्हा एकदा राज्यांची चर्चा सुरु झाली आहे. एक गोष्ट खरी आहे की, मोठ्या राज्यांचे समर्थक असोत किंवा छोट्या राज्यांचे समर्थक असोत; ही सगळी चर्चा- सत्ता, संपत्ती, साधने यांच्या वाटपाची अन मालकीचीच होते. अगदी खऱ्या अर्थाने विचारी अन अभ्यासू म्हणावेत असे लोकसुद्धा यातच अडकलेले असतात. उदाहरण द्यायचे तर, काल झी-२४ तास वर झालेली डॉ. उदय निरगुडकर आणि श्रीहरी अणे यांच्यातील तब्बल तासभराची चर्चा. खरी मेख येथेच आहे. अगदी आम्ही राज्यघटनेत स्वीकारलेली व्यवस्थादेखील यास अपवाद नाही. राज्यांची व्यवस्था federal आणि unitary अशा पद्धतीने होते. आपण federal व्यवस्था स्वीकारली आहे असे बोलले जाते. वास्तविक आपण federal आणि unitary यांचे कडबोळे स्वीकारले आहे. दोन्ही पद्धती स्वतंत्रपणे किंवा दोन्ही पद्धतींचे कडबोळे; या तीनही बाबी अपूर्ण अथवा अयोग्य म्हणाव्या लागतील. कारण त्यामुळे केवळ स्पर्धा आणि संघर्ष उत्पन्न होतात. एवढेच नव्हे तर एक प्रकारचा आंतरिक विरोधाभास तयार होतो.

उदाहरणार्थ- महाराष्ट्राची अस्मिता, एक महाराष्ट्र असे कंठरवाने बोलणाऱ्यांना कर्नाटक, बिहार, तामिळनाडू किंवा अन्य कोणताही प्रांत `आपला' वाटत नाही. मराठी म्हणून एक unit मानणारे लोक भारत हे एक unit मानायला मात्र तयार नसतात. ही बाब अन्य सगळ्या प्रांतांनाही लागू होते. एवढेच नाही तर एकाच प्रांतातील दोन जिल्हे किंवा एकाच जिल्ह्यातील दोन तालुके अथवा एकाच तालुक्यातील दोन गावे अथवा एकाच गावातील दोन घरे अन सरतेशेवटी एकाच घरातील दोन माणसे येथवर हे लोण पोहोचते. आज महाराष्ट्रात पाणी वाटपावरून सुरु असलेले वाद आणि संघर्ष पुरेसे बोलके आहेत. घरापासून तर देशापर्यंत अन त्याही पलीकडे जागतिक स्तरावर, हीच समस्या आहे. आम्ही एक unit म्हणून त्याचा विचार करतो की अनेक unit म्हणून विचार करतो हा मूळ प्रश्न आहे. आम्ही अनेक unit म्हणून विचार करतो त्यामुळे अडचण होते. त्याऐवजी एक unit म्हणून विचार केला तर समस्या दूर होईल. मात्र एक unit म्हणून विचार करायचा असेल तर आमची दृष्टी federal, unitary किंवा त्यांचे कडबोळे अशी न राहता integrated (एकात्मिक) असावी लागेल. आमच्या सगळ्या वैचारिक भोंगळपणाच्या मुळाशी, अन म्हणूनच समस्या सोडवण्याच्या नावाने सुरु असलेल्या कदमतालसाठी एकात्मिक दृष्टीचा अभाव हेच कारण आहे. एकात्मिक दृष्टीच्या अभावीच `हे आणि ते', `आम्ही आणि तुम्ही' अशी भाषा होऊ लागते. `आपण' म्हणजे एकात्मिक दृष्टी. ही `आपण' भावना गरजेनुसार नव्हे, त्या भावनेच्या पोटीच असंख्य लहान units जन्माला घालेल. पण असंख्य लहान units एकत्र येऊन `आपण' भावना निर्माण करू शकणार नाहीत.

या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे- हे सगळे ठीक आहे, पण म्हणजे नेमके काय? तूर्त राज्यासंबंधी विचार करत असल्याने त्याचे सूत्र सांगता येईल की, राज्य हे साधन आहे. साध्य नव्हे. ते साध्य नसल्याने स्वाभाविकच वाटप आणि मालकी याचा विचार सोडावा लागेल. राज्य हे राज्यासाठी नाही, ते जनतेच्या कल्याणाचे एक साधन आहे. त्यामुळे जनतेचे कल्याण हा मुद्दा समोर ठेवून त्याची रचना असावी. म्हणजे केवळ राज्ये लहान असावीत की मोठी असावीत एवढेच नाही; तर त्याचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, मर्यादा यासकट अन्य पुष्कळ बाबींची फेरमांडणी `जनकल्याण' पुढे ठेवून करावी लागेल. कदाचित यात राज्याची शक्ती कमी होईल. शक्यता हीदेखील असू शकते की, एकच केंद्रीय सत्ता असेल आणि मग एकदम प्रशासकीय सोय म्हणून जिल्हे. मधली राज्य ही वस्तूच राहणार नाही. पण राज्य हे साध्य नसून साधन मानल्याने त्याला हरकत असण्याचे कारण नाही. (राज्याच्या संदर्भात चर्चा केली असली तरीही जीवनाच्या बहुतेक सगळ्या अंगांना हे सूत्र लागू होईल. अगदी राज्याचे उद्दिष्ट असलेले `जनकल्याण' म्हणजे काय हे ठरवतानाही हेच सूत्र वापरावे लागेल. नाही तर अनवस्था उत्पन्न होईल.)

ही एकात्मिक दृष्टी स्वीकारली की, मापदंड आणि निकष सारखे करण्याचा वेडेपणा सोडून देता येईल, सोडून द्यावा लागेल. उदाहरणार्थ- आरोग्याचा विचार. हा विचार करताना कोण व्यक्ती औषधांवर अथवा तपासण्या इत्यादींवर किती खर्च करते हे निकष वापरले जातात. एखाद्याची ही गरज जास्त असेल तर एखाद्याची कमी. हा खर्चच करावा लागू नये ही आदर्श स्थिती. पण तसे होत नाही. अमक्यासाठी आरोग्यावर इतका खर्च होत असेल तर दुसऱ्यालाही तितकाच हवा असतो. एवढेच नाही विशिष्ट ठिकाणी काम करणाऱ्यांना देखील समान आरोग्य भत्ता मिळतो. गरज असो की नसो. दुसरे उदाहरण म्हणून पोलिसांचे घेता येईल. काही ठिकाणी अधिक पोलीस लागतील, तर काही ठिकाणी कमी. पोलिसांची गरजच पडू नये ही आदर्श स्थिती. मात्र असा विचार होत नाही. काही ठिकाणी शिक्षण म्हणजे वेगळी बाब राहील अन्यत्र वेगळी. आदिवासी पाडे, छोटी गावे, मोठी गावे, छोटी शहरे, मोठी शहरे, महानगरे येथील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अन अशा अनेक गोष्टी वेगळ्या असतात. त्यांचा विचार उद्दिष्ट लक्षात घेऊन व्हायला हवा. एकात्म दृष्टी बाहेरच्या विषमता आणि विविधता यांच्याकडे लक्ष न देता उद्दिष्टपूर्तीकडे सतत लक्ष पुरवते, तर अनेक unit मानणारी आणि त्यांना एक करण्याचा प्रयत्न करणारी federal अथवा unitary दृष्टी उद्दिष्ट नजरेआड करून बाह्य मापदंड, कसोट्या यांनाच कवटाळून बसते.

ही राज्याचीच नव्हे तर संपूर्ण जीवनाची एकात्मिक दृष्टी विकसित करण्यासाठी (ज्याशिवाय राज्यांची समस्यासुद्धा सुटणार नाही.) संपूर्ण discourse बदलणे, त्याला दिशा देणे ही प्राथमिक गरज आहे. विहीर खोदताना झरे लागणे अन ते मोकळे करणे आवश्यक असते. झरे मोकळे झाले की पाणी आपोआप येत राहते. अन्यथा खड्डे पाण्याने भरून काही होत नाही. आज खड्डे पाण्याने भरण्याचेच काम सुरु आहे. त्यापेक्षा थोडे किचकट वाटले, कठीण वाटले, अशक्य किंवा निरर्थक वाटले, तात्त्विक वाटले तरीही, व्यापक जीवनाच्या संदर्भात झरे मोकळे करण्याचे (discourse बदलण्याचे) काम करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २३ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा