बुधवार, १६ मार्च, २०२२

अर्थबिंदू

तीन बातम्या वाचल्या -

१) पेट्रोल, डिझेलवर प्राप्त होणाऱ्या करांबद्दल सरकारने संसदेत दिलेली माहिती.

२) प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाल्याची बातमी.

३) नागपुरात मालमत्ता कर वाढवण्याच्या प्रस्तावाची बातमी.

सहजपणे चाणक्य आठवले. चाणक्य कशातून तयार झाले? वडिलांच्या अंत्य संस्कारासाठी लाकडे मिळू शकली नाहीत. का? कारण कर देता आला नाही. त्यातून चाणक्य नावाचा ज्वालामुखी जन्माला आला होता.

******

अंत्योदय म्हणजे काय? अंतिम पायरीवरील व्यक्तीचे कल्याण. गांधीजी म्हणत - कोणतीही योजना, निर्णय आदि करताना शेवटला माणूस ध्यानात ठेवला पाहिजे. गांधीजींनी हे आणखीन स्पष्ट करायला हवे होते. कारण योजना, निर्णय आदी तयार करताना अंतिम माणूस ध्यानात ठेवूनही त्याचा त्याला उपयोग होतोच असे नाही. कारण अंत्योदय म्हणजे फक्त अंतिम माणसाला स्वप्न दाखवणे आणि त्यासाठी प्रेरित करणे नाही. अंत्योदय म्हणजे अंतिम माणसाच्या उद्यासोबतच त्याच्या आजचाही विचार. अन अंतिम माणसाचा विचार याचा अर्थ मधल्यांचा विचार नाही असे नाही.

******

तारांकित जीवनशैलीमुळे पैसा फिरत नाही. तो एकरेषीय वाढतो. कोणतीही गोष्ट फिरण्यासाठी त्याचे खालचे व वरचे बिंदू निश्चित हवेत. तारांकित जीवनशैली हे बिंदू ठरवू देत नाही. उलट एखाद्या बिंदूला saturation झाले की नवीन बिंदू ठरवते. त्यामुळे चक्र तयार होण्याऐवजी रेषा तयार होते. आजचा सगळ्यात मोठा आर्थिक प्रश्न हा आहे. परंतु सगळ्यांची प्रामाणिकता गृहित धरून सुद्धा हे सत्य सांगण्याचं धाडस कोणत्याही राजकीय पक्षात, राजकीय नेत्यात, राजकीय विचारधारेत नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, रिपब्लिक, समाजवादी, गांधीवादी, स्वार्थवादी अन हिंदुत्ववादी देखील या बाबतीत एकाच पायरीवर आहेत.

******

फक्त काही बिंदू मांडले आहेत. जोडण्याचं काम तुमचं.

- श्रीपाद कोठे

१७ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा