रविवार, २७ मार्च, २०२२

@माधव भंडारी,

झी २४ तासवर आजची चर्चा ऐकली. (संसद विरुद्ध अण्णा). तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असल्याने, तुम्ही काय बोलणार हे अपेक्षितच होते. पण त्यातील एकही शब्द पटणारा नव्हता. या विषयावरील माझे म्हणणे मी स्वतंत्रपणे लिहीनच. पण एक-दोन गोष्टी मात्र निदर्शनास आणून द्याव्याशा वाटतात. प्रतिनिधित्वाचा अत्यंत चोथा झालेला मुद्दा. `सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' असे ठणकावून सांगणार्या तुकारामांना आता काहीही स्थान राहिलेले नाही का? प्रतिनिधित्व आणि लोकांचे म्हणणे एवढा एकच निर्णायक घटक राहणार असेल तर `पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो' हेच पुन्हा एकदा ग्राह्य धरायला हवे. मागील चूक आम्ही सुधारत आहोत असे म्हणून `पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो' असा ठरावही लोकसभेने करून टाकावा.

दुसरा मुद्दा सार्वभौमत्वाचा. भारतीय जनता पार्टी अजूनही दीनदयाळजींचे छायाचित्र लावत असते. किती जणांना दीनदयाळजी माहित आहेत कोणास ठाऊक? आपल्याला ते ठाऊक आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांचं `राष्ट्रजीवन कि दिशा' आपण वाचावे असे मी सुचवतो. सार्वभौमत्व कोणाचे याविषयी दीनदयाळजींनी काय आणि किती स्पष्टपणे लिहिले आहे पाहावे. दीनदयाळजी केवळ academician नव्हते. या देशातील पहिली आघाडी सरकारे स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते एक कार्यकर्ता होते, जनसंघाचे अध्यक्ष होते, रोजच्या राजकारणाशी त्यांचा संबंध होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे विचार वाचावे.

आपण कधी तरी मुलभूत, भावात्मक विचार अन व्यवहार करणार आहोत की नाही. तसे करणार नसू तर भारतीय जनता पार्टी निरर्थक झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.

`आजची व्यवस्था समाजाचे, देशाचे भले करण्यात अपयशी ठरली आहे. या जागी दुसर्या व्यवस्थेचा विचार व्हायला हवा' असे कोणी म्हणत असेल तर त्याला तो अधिकार आहे की नाही? `तुम्ही तुमचे विश्लेषण मांडा आणि तुमची व्यवस्था प्रस्तुत करा' अशी भूमिका घेण्याऐवजी `तुम्ही विरोधी भूमिका घेता याचा अर्थ तुम्ही चूक आहात' किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचे तर, `गुन्हेगार आहात' अशी भूमिका कितपत योग्य म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा