सोमवार, २८ मार्च, २०२२

कोरोनाचे परिणाम

कोरोनाचे परिणाम हळूहळू पुढे येणार आहेत. रुग्ण, बाधित, मृत्यू, लॉकडाऊन याच्या पलीकडचे ते असणार आहेत. शिवाय ते isolated असणार नाहीत. त्यांचा सामना करायला set rules नाहीत/ नसणार. त्यासाठी लोकांची मानसिकता, दृष्टी, approach या कळीच्या बाबी राहतील. राजकारण, कोणी कोणास काय म्हटले, तू बरोबर की मी, पापे कोणाची; यापलीकडे जाऊन अधिकाधिक सार्थक चर्चा, विश्लेषण, सूचना, दिशा, व्यवहार, तत्वज्ञान यावर भर दिला तर ते उपयोगाचे राहील. आजच जर्मनीतील एका प्रांताच्या अर्थमंत्र्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची बातमी आहे. कोरोनाची चिंता हे त्याचे कारण सांगितले गेले आहे. ते पूर्णांशाने खरे असो वा नसो, त्याचा काथ्याकूट करण्यापेक्षा, कोरोनामुळे अशा घटनाही घडू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. वरवर पाहताना सुद्धा काही मुद्दे डोक्यात येतात. ते केवळ विचारांचे बिंदू म्हणून -

- आतापर्यंत असलेला उद्योगांचा ढाचा पुढेही तसाच राहील का? रहावा का? राहू शकेल का?

- कामगारांची समस्या कसे रूप घेईल?

- आरोग्य हा ऐरणीवरील विषय राहील. त्या दृष्टीने आजची जीवनशैली, आजचे महानगरांचे स्वरूप, आजचे कामाचे स्वरूप, आजच्या आहाराच्या सवयी; यांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. त्या सगळ्याचा उद्योग पद्धतींवर प्रभाव पडेल.

- कोरोनाने निर्माण केलेल्या मानवी जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आजवरचीच आर्थिक धोरणे, आर्थिक रचना, उत्पादन- वितरण- उपभोग- पद्धती रेटणे योग्य ठरेल का? शक्य होईल का?

- मानवी जीवन आणि नवीन आकार घेणारे अर्थचित्र यासाठी सामान्य माणसाची आर्थिक स्वप्ने, आर्थिक सन्मान, आर्थिक आदर्श यांची फेरमांडणी.

- कोरोनाचे पाप ज्या कोणाचे असेल, पण त्यातून सूड आणि कुरघोडी यांना आगामी काळात आघाडीचे स्थान मिळेल. त्यातून जागतिक राजकारण, जागतिक शक्तीसंतुलन, जागतिक अर्थसंतुलन सुरू होईल. सगळे देश या गोष्टींच्या दावणीला बांधले जातील. त्यातून पुन्हा १०-२०-२५ वर्षांनी असेच नवीन काही संकट/ समस्या जगापुढे उभी होईल.

- असे व्हायचे नसेल तर जगातील सत्ताकांक्षा, प्रभुत्व भावना, सर्वशक्तिमान होण्याची स्पर्धा यांना बाजूला सारावे लागेल. सरकार स्तरावर (केवळ भारत नव्हे, जगभरच्या सगळ्या सरकारांना लागू होते.) हे होणे दुरापास्त. यासाठी जागतिक मानवी समुदायाचा पुढाकार, व्यापक मंथन, नवीन जीवनादर्शांना स्थापित करण्याचे प्रयत्न; असे सगळे व्हावे लागेल.

- निखळ मनाच्या माणसांना ही जबाबदारी उचलावी लागेल.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा