गुरुवार, ३१ मार्च, २०२२

मनात येणारे दोन प्रश्न-

 आजकाल सतत मनात येणारे दोन प्रश्न-

१) सतत जात जात जात करणारी प्रसार माध्यमे घटनाविरोधी कृत्य सातत्याने आणि उघडपणे करीत नाहीत का? जात हे ऐतिहासिक वास्तव आहे. पण ती दूर करण्यासाठी तिची चर्चा करणे आणि ती दृढ करण्यासाठी तिची चर्चा करणे यात काही फरक आहे की नाही? राजकीय पक्ष जातीचा वापर करीत असतीलही, ती कदाचित त्यांची गरज असेल. पण माध्यमांची तर ती गरज नाही आणि माध्यमांनी जातीकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच राजकीय पक्षांच्या प्रयत्नांना मिळणारे खतपाणी बंद होईल आणि जातभावना दुबळी व्हायला मदत होईल. समाजात जे जसं काही आहे ते सांगणं, दाखवणं हे प्रसार माध्यमांचं काम आहेच. पण चांगला, आदर्श समाज घडवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असल्याने प्रसार माध्यमांचीही आहेच ना? प्रसार माध्यमे समाजाचा घटक नाहीत का? चांगल्या समाजासाठी सगळ्यांचा हातभार नको का लागायला? त्यांच्या या घटनाविरोधी कृत्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी की नको?

२) हिंसा ही सभ्य म्हणता येणार नाही. ती समूळ नष्ट करता येईल का हा सुद्धा एक गंभीर प्रश्नच आहे, पण निदान हिंसेला तात्त्विक आणि अधिकृत समर्थन अयोग्यच म्हटले पाहिजे. हेच आपल्या राज्यघटनेला धरूनही आहे. मग अधिकृतपणे हिंसेचे समर्थन करणाऱ्या मार्क्सवादावर देशभरात बंदी का घालण्यात येऊ नये?

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा