रविवार, १० एप्रिल, २०२२

ज्याचा त्याचा प्रश्न

मन आणि बुद्धी हे एकमेकांना पर्याय आहेत अशी आपली पुष्कळदा जाणता किंवा अजाणता धारणा असते. मग आपण ज्याचा वापर करतो तेच महत्वाचे आहे असे आपण हिरीरीने मांडतो. पुष्कळदा तर त्यासाठी आपण सवलतीची अपेक्षा ठेवत असतो. म्हणजे मन वापरणाऱ्याला सुप्त अपेक्षा असते की, बुद्धीच्या त्रुटी किंवा चुका दुर्लक्षित केल्या जाव्यात किंवा त्या माफ केल्या जाव्यात. तर बुद्धीचा वापर करणाऱ्याच्या नजरेत मनाची काही मातब्बरी नसते. भावना, दुसऱ्याचा विचार वगैरे निरर्थक आहे, असे त्याचे मत. कोणताही निर्णय घेताना, योजना करताना, काम करताना, वागताना वगैरे यापैकी एकाचाच वापर करताना आणि त्याचा आग्रह धरताना बहुतेक जण आढळतात. खरे तर विश्वनिर्मात्याने दोन्ही निर्माण करून दोन्हीचे वितरण केले आहे. दोन्हीच्या जागा, प्रयोजन आणि त्या त्या ठिकाणी त्याच्या उपयोगाचे प्रमाण हे त्याने मोकळे सोडले आहे. तीच आपली कसोटी असते. कसोटी पार करणाराच पुढे जात असतो. तिथेच राहायचे असल्यास, `ज्याचा त्याचा प्रश्न.'

- श्रीपाद कोठे

५ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा