सोमवार, ११ एप्रिल, २०२२

काही महत्वाच्या बातम्या...

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती कमी झाली.

- कुठे अन्न मिळतं का यासाठी अमेरिकन लोक गाड्या काढून वणवण फिरताहेत. अन अन्नासाठी रांगा लावत आहेत.

- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना केली आहे की, केंद्राने २० लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेत ओतावे.

- आयपीएल रद्द होण्याने क्रिकेट संघटनेला मोठा आर्थिक तोटा होईल.

*************

या सगळ्या बातम्या आर्थिक विषयांच्या आहेत. सगळ्या जगभरच अशा प्रकारचे मंथन सुरू आहे. त्यावर मतमतांतरे व्यक्त होणेही स्वाभाविक आहे. त्यातील दुर्दैवाची गोष्ट एवढीच की, त्या मतांमध्ये अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, ज्या तपासून पाहण्याची गरज आहे. जसे ट्रम्प यांची संपत्ती कमी होणे वाईट आहे असे गृहीत धरले जाते. किंवा क्रिकेट संघटनेला तोटा होऊ नये हे गृहीत धरले जाते. किंवा सरकारने अर्थ व्यवस्था उचलून धरावी, सगळ्यांची संपत्ती सुरक्षित राखावी इत्यादी गृहीत धरले जाते. अशा आणखीनही बाबी. परंतु ही गृहीतके योग्य आहेत का असा प्रश्न मात्र विचारला जात नाही.

ट्रम्प यांची संपत्ती कमी झाली किंवा क्रिकेट संघटनेला फायदा झाला नाही तर त्यासाठी उर बडवायची काय गरज? संपत्तीची वाढ एकरेषीय (linear) राहायला हवी, ती वाढत तर राहायला हवी पण ती कधीच किंचीतही कमी मात्र व्हायला नको. ही अपेक्षाच हास्यास्पद, अव्यवहार्य आणि विसंगत आहे. जीवनाच्या अन्य सगळ्या अंगांप्रमाणे संपत्ती सुद्धा चक्रीय (cyclic) असणेच योग्य असते. आर्थिक बाबींची चर्चा करताना हा मुद्दा महत्वाचा ठरतो.

सरकारने सगळं काही करावं ही देखील अशीच अवास्तव अपेक्षा. भारतात आपण घरात धान्य, किराणा, पैसे साठवून/ जमवून ठेवतो. अतिशय मूलभूत अशी ही सवय आणि वृत्ती आहे. त्यामुळे आमच्याकडे गाड्या नसतील पण आम्हाला अन्नान्न व्हावे लागत नाही. आज आपलेही विद्वान, नियोजनकर्ते अर्थव्यवस्थेतील गाड्यांचे महत्व वगैरे पाजळतात तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नसतो. तथाकथित decision makers ला विचारी होण्याची किती गरज आहे हे सहज लक्षात येणारे आहे.

हीच गोष्ट सरकारने अर्थव्यवस्थेत पैसा ओतण्याची. सरकार नावाच्या यंत्रणेला पैसा देणाऱ्या भांडवलप्रधान व्यवस्थेने विकसित केलेले हे तत्वज्ञान आहे. एक नवा पैसाही कमी न होता तहहयात आपले व्यवस्थित चालायला हवे अशी यांची इच्छा असते. सरकारने पैसा ओतावा पण तो आणावा कुठून? एक तर चलन वाढवा किंवा कर्ज घ्या. चलन वाढवले तरी चलनाची किंमत घसरले आणि कर्ज घेतले तरी घसरेल. गेली कित्येक वर्षे जगभरात हेच सुरू आहे. त्यामुळेच कोरोना असो वा नसो, अर्थव्यवस्था नेहमीच अडचणीत राहतात आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कधीही आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकत नाहीत. डिजिटल व्यवहार हा काही त्यावर तोडगा नाही कारण त्याने फक्त चलनाच्या वापराची पद्धत बदलते मूळ चलनवाढीची समस्या तशीच राहते. यासाठी संपत्ती निर्माण कशी होते याचा विचार, संपत्तीची चक्रीय व्यवस्था, अन संपत्तीची उद्दिष्टे यांचा मुळातून विचार होणे गरजेचे आहे. हे तात्त्विक वाटण्याचा संभव आहे पण आजची समस्याच मुळात तात्त्विक आहे त्याला जोडतोडीचे व्यावहारिक उत्तर चालू शकत नाही.

भारताचा विचार करायचा तर धाडसाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. चार दोन अब्जाधीशांची संपत्ती कमी झाली किंवा हॉटेल, गृहबांधणी, आरोग्य या क्षेत्रातील साखळी कंपन्या मोडल्या; मनोरंजन क्षेत्र मोडून पडले तरी उर बडवून घेण्याचे कारण नाही. खानपान, गृहबांधणी, आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती, असंख्य उद्योग यांचं ज्ञान, कौशल्य, मनुष्यबळ आजही भारतभर सगळीकडे भरपूर उपलब्ध आहे. प्रश्न एवढाच आहे की, त्याकडे डोळसपणे पाहण्याची आणि महानगरीय चाकोरीबाहेर पाहण्याची तयारी हवी. जिगर हवी. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तशी वीस लाख कोटींची गरजच नाही. दोन लाख कोटीत देखील देश पुन्हा उभा होईल. प्रामाणिक धाडसाची मात्र गरज आहे.

- श्रीपाद कोठे

रविवार, १२ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा