बुधवार, २० एप्रिल, २०२२

निमित्त प्लगचे

काल एक प्लग आणायला वीज सामानाच्या दुकानात गेलो. ४-५ जण होते अन दुकानदार एक कुलर दुरुस्त करीत होता. माझ्या आधी आलेल्या त्या ४-५ जणांपैकी एकाने दुकानदाराला विचारले- `एखादा मुलगा आहे का?' दुकानदाराने काम काय असा प्रतिप्रश्न केला. तो माणूस म्हणाला- `घरचा एक बोर्ड निघाला आहे. दुसरा बोर्ड घरी आहे. फक्त लावायचा आहे.' दुकानदाराने उत्तर दिले- `तीन चार दिवस मुलं बाहेरगावी गेली आहेत.' काही क्षण घोटाळून तो माणूस निघून गेला. तो गेल्यावर बाकीच्या लोकांकडे वळून दुकानदार म्हणाला- `मुलगा नाही असं नाही. पण त्या माणसाची परिस्थिती पहा. इथून चार घरं पलीकडेच राहतो. मी ओळखतो त्याला. मुलगा पाठवला असता तर हात लावायचे १०० रुपये घेतले असते. तो बिचारा नाही देऊ शकत एवढे पैसे. आता करेल काही तरी. दोरीने- ताराने बांधून वगैरे.' काय म्हणणार? म्हटले तर दुकानदाराची समजूतदारी. अन म्हटले तर वर्तमान स्थितीवरील भाष्यही. वर्तमान अर्थकारणाने निर्माण केलेले असे अनेक प्रश्न, उपप्रश्न, प्रवाह सतत अनुभवायला मिळतात. यांना अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात स्थान नसते अन अर्थसंकल्पातही. शास्त्रे, धोरणे, योजना, व्यवस्था जगण्याशी कधी जोडल्या जाणार?

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा