शनिवार, १६ एप्रिल, २०२२

तंत्र लोकशाही

वेगवेगळ्या प्रकारच्या लोकशाहीची चर्चा होत असते. तंत्र लोकशाहीची चर्चा मात्र ऐकिवात नाही. अशी तंत्र लोकशाही असायला मात्र हवी. तंत्रज्ञानाचा विकास, त्याचे उपायोजन, त्याचे upgradation अशा सगळ्याच बाबतीत लोकशाही हवी. आज ती नाही. राज्यकर्ते, उद्योजक, तंत्रकुशल लोक यांच्या विळख्यात तंत्रज्ञान अडकले आहे.

एक छोटासा मुद्दा - आपण रोज वापरत असलेले apps अपडेट होत राहतात. अन हे सतत होत राहते. का? कशासाठी? बरं त्यात फार काही तथ्य असतं असं नाही. एखादं function इथून काढून तिथे टाकणे, माहिती- चित्र- चिन्ह- यांची उभी रचना आडवी किंवा आडवी रचना उभी करणे; यासारख्या निरुपद्रवी दिसणाऱ्या, भासणाऱ्या आणि असणाऱ्या बाबी लादल्या जातात आणि या निरर्थक आणि निरुपद्रवी बाबींवर वेळ, पैसा, मन, बुद्धी आणि ऊर्जा वाया घालवावी लागते. कशासाठी? करोडो लोकांच्या या बहुमोल गोष्टी अत्यंत निरर्थक बाबींसाठी वेठीला धरण्याचा अधिकार कोणाला कसा काय असू शकतो? वरून user friendly वगैरे शब्दांचे खेळ करण्याचा निलाजरेपणाही सुरूच असतो. User friendly याचा अर्थ तंत्रकुशल व्यक्तीची सोय किंवा आवड किंवा लहर किंवा सोस; असा नाही होऊ शकत. बहुतांश तंत्रकुशल व्यक्ती या एकांगी, हट्टी आणि उर्मट वृत्तीच्या असतात. अगदी प्लम्बर, गवंडी पासून तर information technology च्या मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत. हा सार्वत्रिक अनुभव आहे. या तंत्रकुशल व्यक्तींची दृष्टी आणि जाणीव व्यापक करणे नितांत गरजेचे आहे.

खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्यासाठी सगळ्यात पहिली बाब म्हणजे तंत्रज्ञान हा शब्द, ही कल्पना, ही बाब यांच्याविषयी मनात असलेला aura निपटून काढणे ही होय. तंत्रज्ञान याकडे तुच्छता किंवा अपार आदर भावना या दोन्ही प्रकारे न बघता अन्य बाबींसारखीच ती एक गोष्ट आहे ही वृत्ती वाढायला हवी. तरच तंत्रज्ञान आणि जीवन हातात हात घालून चालू शकतील.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १७ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा