शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

मुलामुलींचे प्रमाण

एका जुन्याच विषयाचा एक संदर्भ आज पुन्हा वाचण्यात आला. तो म्हणजे- मुलांच्या तुलनेत मुलींची कमी होणारी संख्या. महाराष्ट्रात तर हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९०० मुली असे आहे असे म्हणतात. या विषयावर चर्चा, आवाहने नेहमीच होत असतात. परंतु नेहमीप्रमाणेच ती उथळही असतात. `स्व' बाजूला ठेवून गांभीर्याने विचार करणाऱ्यांसाठी या संदर्भात काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

१) हजार मुलांमागे ९०० मुली याचा अर्थ हे प्रमाण १० टक्के कमी.

२) याचा सरळ सरळ अर्थ असा की, १० टक्के मुलांना अधिकृतपणे अविवाहित ठेवणे भाग आहे.

३) १० टक्के मुलांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, भावनिक गरजांपासून जबरदस्तीने दूर ठेवण्याचे परिणाम चांगले होतील का?

४) समाजाचा विचार तूर्त थोडा बाजूला ठेवला तरीही १० टक्के पुरुषांना त्यांच्या स्वाभाविक विकासापासून हे दूर ठेवणे नव्हे का?

५) स्त्री पुरुष लोकसंख्येचे प्रमाण सारखे होऊ शकेल का?

६) तसे होईपर्यंत काय?

७) यावर काय उपाय असू शकतो?

८) monogamy हा सामाजिक, नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक आदर्श म्हणून प्रस्थापित करून त्याची जोपासना करावी. मात्र कायद्याने polygamy ला अवैध ठरवू नये.

९) समाजात दोन्हीला मान्यता असावी. जबाबदारीची पद्धती निश्चित व्हावी.

१०) तसेही समाज हा व्यामिश्र असतो. एखादी व्यक्ती लग्न, कुटुंब इत्यादीपासून दूर राहू शकते. शारीरिक आदी गरजा बाजूला सारून सार्थक आयुष्य जगू शकते. तसेच काहींच्या या गरजा वेगळ्याही असू शकतात. हे स्त्री व पुरुष दोघांनाही लागू आहे.

११) कायद्याने या विविध वृत्तींना मोकळीक दिली तर त्यातून स्वाभाविक सामाजिक संतुलन साधले जाऊ शकते.

१२) आज कमी असलेली मुलींची संख्या किंवा यावरील उपायांचा परिणाम होऊन २५-५० वर्षांनी कदाचित वाढू शकणारा मुलींचा समाजातील टक्का (किंवा मुलांचाही) यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यामुळे कमी होऊ शकतील.

१३) सगळ्यांसाठी धरूनबांधून सगळ्या समान गोष्टी ही अभारतीय पद्धती आहे. शिवाजी वा श्रीकृष्ण यांनी अधिक लग्न केले म्हणून भारताने त्यांना तिरस्कृत केले नाही. अन अधिक लग्न करूनही द्रौपदीला प्रात:स्मरणीय दर्जा दिला.

१४) विविध वृत्तीप्रवृत्तींना सामावून घेत स्वाभाविक सामाजिक संतुलन साधणे, या भारतीय मार्गाचा सखोल विचार आवश्यक आहे.

१५) उपासना मार्गांच्या बाबतीतच नव्हे तर सामाजिक व्यवस्था, रीतीरिवाज यांच्या बाबतीत सुद्धा भारत सदैव सहिष्णू आणि उदार राहिला आहे. त्याची व्यवस्थित मांडणी भारतासाठी अन जगासाठीही आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा