शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

इकडेतिकडे

१) शब्द न पाळण्याचा एक महारोग समाजाला लागला आहे. त्यात भर म्हणजे दिलेला शब्द पाळू शकत नसल्यास ते संबंधितांना सांगण्याची जबाबदारी आपली नसते, ही अपार श्रद्धा बाळगण्याएवढे बेजबाबदार निर्ढावलेपण आता समाजाच्या अंगी मुरून गेले आहे. कौशल्य विकासात या रोगाच्या दुरुस्तीला काही वाव आहे का माहीत नाही, की हा रोग वाढवणे हाच कौशल्य विकासाचा गाभा होऊन बसेल?

२) दुष्काळाच्या संदर्भात- कर्नाटक भाजपचे अध्यक्ष येडीयुरप्पा यांनी एक कोटी रुपयांची गाडी घेऊन पाहणीला जाणे आणि महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ खडसे यांच्या दौऱ्यासाठी helipad तयार करण्यासाठी हजारो लिटर पाणी वापरणे; या दोन गोष्टींवरून टीकाटिप्पणी सुरु आहे. ही टीकाटिप्पणी रास्त आहे. ते केवळ भाजपचे आहेत यासाठी त्यावर पांघरूण घालणे वा दुर्लक्ष करणे बरोबर नाही. केवळ संवेदनशीलताच नव्हे, तर एक वेगळी मूल्यभावना रुजवण्याचा प्रयत्न भाजपने करायलाच हवा. ही पक्षाची जबाबदारीही आहे अन पक्षाच्या समर्थक आणि हितचिंतकांची भावना अन अपेक्षाही. बटबटीत भोगवाद या देशाचा स्वभावही नाही अन तो जगासाठी कल्याणकारीही नाही. भाजपने त्याचे समर्थक होऊ नये.

- श्रीपाद कोठे

१६ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा