मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

प्रज्ञा सिंह

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावरून जो गदारोळ सुरू झाला आहे तो पाहून, आपण एका निर्बुद्ध युगात जगतो आहोत याचा विषाद वाटतो.

- साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे, तक्रार करणारे, ते नाकारणारे किंवा त्यांना शहाणपण शिकवणारे; सगळ्यांनी; फार नाही मिनिटभर स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहावे.

- एखाद्या व्यक्तीची भूमिकेनुरूप वेगळी कृती असू शकते हे समजू न शकणाऱ्या समाजाला विचारी म्हणणं शक्य नाही. हेमंत करकरे यांच्या दोन्ही कृती खऱ्या असू शकतात आणि साध्वी प्रज्ञा यांनी त्यांची आपबिती सांगितल्यामुळे करकरे यांनी दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जे शौर्य दाखवले त्याला बाधा येते असेही समजण्याचे कारण नाही. समजा दहशतवादी हल्ला झाला नसता तर? दोन वास्तव गोष्टींची कशीही तर्कशून्य सांगड घालणाऱ्यांना विचार करता येतो असे म्हणणे धाडसाचे होईल.

- सोय, गैरसोय !! सगळ्यात मोठा मुद्दा. एखाद्या व्यक्तीचे हाल, त्याचे सोसणे, त्याचे भोगणे (अन हे सारे तीव्रता, प्रकार आणि प्रमाण यात कितीतरी अधिक) यापेक्षा तथाकथित, ज्याला शेंडा ना बुडूख, असे public perception अतिशय महत्वाचे ठरते; हा तर संतापजनक आणि घोर निराश करणारा भाग आहे. लोकशाही काय, त्यासाठीच्या निवडणुका काय अन एकूणच सगळा तमाशा, त्याची अगतिकता यांची चीड येत नाही. उलट कथित व्यवस्थेचे गोडवे गात थोडं सोसलं पाहिजे, असं म्हणण्याचा निर्लज्जपणा; मानवी जीवनाची आणि या युगाची लाज वाटायला लावतो. साध्वीने सहन करायला पाहिजे असं म्हणण्याऐवजी, त्यांचे वक्तव्य सहानुभूतीने सहन करण्याची शक्ती आपल्यात हवी; असे न वाटणे हा समाजाचा पराभव आहे.

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा