बुधवार, २७ एप्रिल, २०२२

भवभयातील रतीरंग

आज रात्री बरोब्बर ७० वर्षे होतील. २८ आणि २९ एप्रिल १९४५ च्या मधली रात्र...!!!

जवळपास साडेचार महिन्यांपासून, तारीखच सांगायची तर १६ जानेवारी १९४५ पासून अडॉल्फ हिटलर बर्लिन शहरात एका भुयारात राहत होता. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवट नजरेच्या टप्प्यात आला होता. आपल्या क्रौर्यगाथांनी दहशत निर्माण करणारा, वंशश्रेष्ठतेचा दुराग्रही योद्धा चारही दिशांनी घेरला गेला होता. अमेरिका, सोव्हिएत युनियन यांच्या मित्र देशांच्या फौजा जर्मनीत घुसून बर्लिनच्या दिशेने पुढे सरकत होत्या. लाखो माणसांना मुंगीसारखे चिरडून टाकणारा हिटलर एका भुयारात लपून बसला होता. उंदरासारखा असे मात्र म्हणता येणार नाही. कारण तिथूनही आपली सत्ता चालवण्याचा त्याचा आटापिटा सुरूच होता. जर्मनीची हार होणार हे निश्चित झाल्यावर त्याने जर्मनीतील सगळी औद्योगिक प्रतिष्ठाने जमीनदोस्त करण्याचा हुकुम त्या भुयारातून दिला. ही औद्योगिक प्रतिष्ठाने शत्रूच्या हाती पडू नयेत हा उद्देश. शस्त्रास्त्र मंत्री अल्बर्ट स्पिअर याला या कामाची जबाबदारी त्याने सोपवली. स्पिअरने काहीही प्रतिसाद न देता त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. २० एप्रिल १९४५ ला त्याचा ५६ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी सोव्हिएत फौजांनी जर्मनीची राजधानी बर्लिनवर तुफान बॉम्बहल्ला केला. पूर्ण जर्मनी भाजून काढली. बर्लिनच्या संरक्षणासाठी जर्मन फौजांनी यावे ही त्याची आज्ञा पाळण्यास लष्कराने नकार दिल्याची बातमी त्याला २२ एप्रिल रोजी देण्यात आली तेव्हा तो पूर्ण निराशेत बुडाला आणि त्या क्षणी त्याने सर्वप्रथम आपला पराभव अटळ असल्याचे मान्य केले. त्याच दिवशी त्याने हेही जाहीर केले की, शेवटपर्यंत आपण बर्लिनमध्येच राहू आणि अखेरीस स्वत:वर गोळी झाडून घेऊ. डॉ. वेर्नर हेस यांना त्याने आत्महत्येची खात्रीची पद्धत कोणती याची माहितीही विचारली. डॉ. हेस यांनी बंदूक व विष यांचा एकत्र उपयोग करण्याचा सल्ला दिला. ज्यावेळी फिल्ड मार्शल हर्मन गोरिंग याला याविषयी कळले तेव्हा त्याने हिटलरला एक तार पाठवली. १९४१ च्या निर्णयाप्रमाणे आपण तुमचे उत्तराधिकारी असल्याने आता तसे जाहीर करावे, असे त्याने त्या तारेत म्हटले होते. यावर हिटलर संतापला आणि त्याने गोरिंगला काढून टाकण्याचे आदेश दिले. २७ एप्रिल १९४५ रोजी बर्लिनचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटला. हिटलरचे अधिकारी तहाच्या व शरणागतीच्या हालचाली करीत असल्याचे त्याला कळले. त्याचा नुसता संताप संताप होत होता. सगळीकडून घेरला गेलेला, अधिकारी, सैन्य सगळे सोडून जात असलेले, पराभव समोर दिसतोय आणि स्वत: एकाकी असहाय्य अशी त्याची अवस्था झाली होती.

दरम्यानच्या काळात त्याने आपली प्रेयसी ईव्हा ब्राऊन हिला बर्लिनला बोलावून घेतले होते. त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान असलेली ईव्हा ब्राऊन १९२९ पासून म्हणजे १६ वर्षांपासून त्याची प्रेयसी होती. ती छायाचित्रकार होती. हिटलरची उपलब्ध असलेली अनेक छायाचित्रे तिनेच काढली आहेत. पूर्ण घायाळ झालेल्या प्रियकराच्या हाकेला ओ देऊन तीही त्याच्याकडे भुयारात आली. २८ आणि २९ एप्रिलच्या मधल्या रात्री त्या दोघांनी विवाह केला. भुयारात सोबत असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या उपस्थितीत, जगाला हालवणाऱ्या हिटलरचा विवाह झाला. विवाहाच्या प्रमाणपत्रावर ईव्हा ब्राऊनने आपले नाव बदलून ईव्हा हिटलर असे केले. नवविवाहित जोडप्याने उपस्थितांना अल्पाहार दिला आणि ते आपल्या शयनकक्षात गेले. तेथे रात्री हिटलरने आपले मृत्युपत्र लिहिले. २९ एप्रिलच्या पहाटे चार वाजता त्याने मृत्युपत्रावर सही केली. २९ एप्रिल रोजीच त्याला त्याचा सहकारी, इटलीचा बेनिटो मुसोलिनी आणि त्याची पत्नी क्लारा यांना मारून व उलटे करून लटकावल्याची बातमी कळली. त्या क्षणी त्याने आधीच घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याला देण्यात आलेल्या सायनाइड विषाबद्दल त्याला संशय निर्माण झाला तेव्हा त्याने ते आपली लाडकी कुत्री ब्लोंडी हिला खाऊ घातले. ब्लोंडी तत्काळ मरण पावली. हिटलरच्या मनाची खात्री पटली. ३० एप्रिल रोजी सोव्हिएत फौजा भुयारापासून १६०० फुटांवर येउन पोहोचल्या होत्या. हिटलरने भुयारातील सहकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यांना सूचना दिल्या. दुपारी एक वाजता जोडप्याने दोन सहकारी आणि खानसामा याच्यासोबत जेवण घेतले. नंतर त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. दुपारी अडीच वाजता ते आपल्या खाजगी कक्षात गेले. तासाभराने म्हणजे ३० एप्रिल १९४५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिटलरच्या शयनकक्षातून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. काही मिनिटे वाट पाहून सहकारी आत गेले तेव्हा एका सोफ्यावर अडोल्फ व ईव्हा निष्प्राण पडलेले होते. अडोल्फच्या डाव्या बाहुपाशात असलेली ईव्हा शांत होती. तिच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. अडोल्फच्या कपाळातून उजव्या बाजूने रक्त येत होते. ठरल्याप्रमाणे आधी ईव्हाने सायनाइडचे चोकलेट खाल्ले आणि ती मेल्याची खात्री झाल्यावर अडोल्फने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सहकाऱ्यांनी लगेच त्यांचे मृतदेह बाहेर आणले. शत्रू तोंडावर उभाच होता. त्याच्या हाती ते लागायला नको होते. त्यामुळे दोन्ही निष्प्राण देहांवर पेट्रोल टाकण्यात आले आणि ते पेटवून देण्यात आले. त्यावर आतील कागदांच्या चळती आणून टाकल्या गेल्या. काहीही मागे राहू नये याची काळजी घेतली गेली. तरीही सोव्हिएत फौजांनी काही अवशेष नंतर हस्तगत केलेच आणि अनेक वर्षेपर्यंत, अनेकदा त्याची छाननी, तपासणी, खात्री करून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. न जाणो, हातावर तुरी देऊन हिटलर निघून तर गेला नसेल आणि हे अवशेष अन्य कोणाचे तरी असतील. अचानक हिटलर कुठून तरी टपकेल तर !! भवभयाचे किती रंग !!!

भयापोटीची आक्रमकता, आक्रमणातून उत्पन्न झालेले भय, अस्तित्वाचे भय, अस्तित्व संपल्यानंतरही उरलेले कल्पनेतील भय... भवभयाचे कितीतरी रंग... अन त्यात मिसळलेला ईव्हा आणि अडोल्फचा रतीरंग...!! सगळे राख होणार हे दिसत असूनही, असे काय होते की तिने त्याच्याकडे यावे? पुढचा दिवसही आपला नाही हे ठाऊक असतानाही लग्न करण्याची काय गरज होती? कोणते समाधान मिळाले दोघांनाही? कोणता आनंद मिळाला? चाळीस तासांपेक्षाही कमी अवधीच्या या संसाराने कोणते पूर्णत्व बहाल केले असेल त्यांना? जगाला नाचवणाऱ्या योद्ध्याला कोणती कमतरता होती? आणि कोणतेही भविष्य नाही, नावही बदनामच होणार हे माहित असतानाही कोणती प्रीती होती? भयाने अंतर्बाह्य वेढले असतानाही, कोणता आधार पुरवला असेल या रतीरंगाने? या पृथ्वीच्या रंगमंचावरील नाटकांना अंत नाही हेच खरे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

२८ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा