शनिवार, ९ एप्रिल, २०२२

मृत्यूचिंतन

कोरोना युरोपात थैमान घालतो आहे. बातम्या असे सांगतात की, त्या देशात मृतदेह ठेवायला पेट्या कमी पडताहेत, मृतदेह पुरण्याच्या जागा कमी पडताहेत. या देशांनी मृतदेहांचे दहन करावे अशी सूचनाही केली जाते. अभिवादनाची भारतीय पद्धती स्वीकारली तर अंत्य संस्काराची पद्धतही स्वीकारावी. पण हे इतके सोपे नाही आणि असे होईल असेही वाटत नाही. कारण अभिवादन करण्यामागे फार मोठी जीवनदृष्टी, मोठे तत्वज्ञान नाही. ते एक gesture आहे. अंत्यसंस्कार करताना मात्र जीवनदृष्टी आणि तत्वज्ञान त्यामागे असते. ज्या देशांमध्ये मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली आहे ते बहुतेक ख्रिश्चन मताचे अनुयायी आहेत. त्यांची जीवनाकडे आणि मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. त्यांच्या धारणा वेगळ्या आहेत. त्यांचे समज वेगळे आहेत. हे सगळे एकाएकी टाकून देणे शक्यही नसते आणि तशी अपेक्षाही करता येत नाही. मात्र या पार्श्वभूमीवर जीवन आणि मृत्यू याकडे पाहण्याच्या, या बाबी समजून घेण्याच्या विविध विचारांची चर्चा होऊ शकते नव्हे ती झालीही पाहिजे. कारण त्यातून ही समस्या या क्षणी किती कमी होईल हा भाग महत्वाचा नाही. ती तशीही लगेच कमी होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु जीवन आणि मृत्यू संबंधीच्या दृष्टीची ही चर्चा दोन बाबींच्या मुळाला हात घालेल. एक म्हणजे मानवी मृतदेहांच्या दफन पद्धतीने निर्माण केलेल्या समस्यांना (कोरोना निरपेक्षपणे) त्यातून उत्तर मिळेल. अन दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे - यातून एकूणच जीवनदृष्टी आणि जीवनमूल्यांना आकार देता येईल. आज जगभर एकूणच जीवनासंबंधी जो चर्चेचा नुसता चोथा केला जातो आणि मार्ग काही निघतच नाही, तो मार्ग यातून निघेल. मृत्यूच्या विचाराशिवाय जीवनाचा विचार अपूर्ण आहे. आम्ही भारतीय सुद्धा आत्मा, परमात्मा खूप बोलतो पण त्याला कांदे, बटाटे, टमाटे याहून अधिक किंमत देता येत नाही. या आत्मा, परमात्मा आदीचं नीट आकलन, त्याचा योग्य बोध आणि त्यानुसार जीवनाची रचना करायची असेल तर मृत्यूचा विचार क्रमप्राप्त ठरतो. मृत्यूचा विचार म्हणजे मृत्यूला कवटाळणे नाही तर त्याच्या स्वरूपाचा विचार. जीवनाच्या अर्थपूर्ण स्वीकारासाठीचा विचार. पाश्चात्य आणि भारतीय विचारांचा फरक समजून घेण्यासाठीही हे महत्वाचे आहे. रामकृष्ण मिशनचे पूर्व अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे विद्वान विचारावंत, ब्रम्हलीन स्वामी रंगनाथानंद 'भारतीय संस्कृती का सार' या त्यांच्या व्याख्यानात म्हणतात - 'कोई भी तत्वज्ञान मृत्यू की समस्या सुलझाए बिना प्रगल्भता प्राप्त नहीं कर सकता. युनानी संस्कृती के महत दोषो मे से यह एक था.' वर्तमान पाश्चात्य जीवन, जीवनदृष्टी,  जीवनमूल्य, तत्वज्ञान यांच्या मुळाशी ही युनानी संस्कृती आहे, असे प्रतिपादन करून लोस डिकीनसन यांचे एक मत ते उद्धृत करतात की, 'जितनी अधिक पूर्णता से युनान को जगत अपने घरसदृश लगा, जितनी खुशी से और स्वतंत्रता से अपनी शक्तियो का प्रयोग करने से उसने स्वयं को तैय्यार किया, जितनी प्रबलता और तीव्रता से उसने कार्य और उमंगभरा जीवनयापन किया, उतना ही विसंगत, कटू और समझ से परे ऐसी वृद्धता और मृत्यू की विलक्षणता का उसे दर्शन हुआ. इस समस्या पर उसे अपने धर्म द्वारा केवल अत्यल्प प्रकाश मिला. और उससे भी कम सांत्वना मिली. युनानी जीवनसंगीत का यह बेसुरीलापन समाप्त किये बिना इस संस्कृती की न्यूनता खतम नहीं होगी.' आज पाश्चात्य जगतच नव्हे तर पाश्चात्य जीवन हेच जगाचे कमीअधिक जीवन झाले असल्याने संपूर्ण जगापुढे हे मूलभूत संकट पुन्हा उपस्थित झाले आहे. केवळ सध्याच्या समस्येवर मार्ग काढणे एवढेच याचे स्वरूप नाही अन तेवढ्याने भागणारेही नाही. त्याहून अधिक खोल जाण्याची गरज आणि परिस्थिती आज मानवासमोर आलेली आहे. ज्या हिंदू/ भारतीय चिंतनाला हे आव्हान पेलावे लागणार आहे, त्यासाठी हिंदू/ भारतीय समाज तयार आहे का? किती तयार आहे? काळच सांगेल.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १० एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा