शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

अर्थक्रांती

सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी समृद्ध लोकांवर अधिक कर लावण्याचा एक प्रस्ताव प्रत्यक्ष कर मंडळाकडे देण्यात आल्याचे वृत्त आहे. वर्षाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या लोकांचा super rich असा उल्लेख त्यात आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कर लावावा अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचा काय तो निर्णय होईलच. माझी सूचना अशी की - राहते घर आणि २५ कोटी रुपये याच्या वरील सगळी व्यक्तिगत संपत्ती सरकारची करून घ्यावी. पुन्हा एकदा सुरळीत कारभार सुरू झाल्यावर पुन्हा हे लोक पैसा कमवू शकतीलच. यात संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहीलच फक्त तो तात्पुरता मर्यादित केला जाईल. तसेही बहुतेक सगळेच अधिकार परिस्थिती सापेक्षच असतात. संपत्तीचा अधिकारही तसाच आहे. ही सूचना थोडी कठोर वाटेल. पण सध्याची परिस्थिती आणि मानवीयता यांचा विचार करून तसा काही विचार करायला हरकत नसावी.


- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२०


मला आपली सूचना फारशी पटत नाही कारण सगळेच श्रीमंत 420गीरी करत मोठे होत नाहीत. अनेक जण त्यांच्या मेहनतीने आणि स्किलने मोठे होतात. अशा लोकांना उत्तम काम करण्याची उत्तेजनाच राहणार नाही..


Yuvraj Tare सूचना न पटणे ok. पण त्यांनी ४२० गिरी करून पैसा कमावला अन म्हणून तो घ्यावा असं म्हटलेलं नाही अन अभिप्रेतही नाही. परिस्थिती आणि मानवता यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. अन संपत्ती ही एका मर्यादेतपर्यंतच व्यक्तिगत मालकीची असावी. एखाद्याने कितीही स्वतःच्या कष्टाने अन बुद्धीने संपत्ती कमावली तरी, त्याचे विश्लेषण केले तर, त्यात अनेकांचा सहभाग असल्याचे सहज लक्षात येते. तसेही श्रमिकांना समान अधिकार, श्रम आणि भांडवल यांचे समान मूल्य; या गोष्टी आपण अजून कुठे स्वीकारल्या आहेत? शिवाय अभिनेते, अभिनेत्री, राजकारणी यांच्या अब्जावधींच्या संपत्तीला तुम्ही म्हणता ते निकष लावता येत नाहीच.


Shripad Kothe समजा एक व्यक्ती विशिष्ट निर्मिती कारखाना, सेवा क्षेत्रात व्यवसाय चालवत आहे आणि वर्षाला  एक दोन कोटींचे इन्कम आहे आणि त्याची संपत्ती साधारण 20 ते 25 कोटींच्या घरात आहे तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला व्यवसाय वृद्धी करण्याची इच्छाच राहणार नाही. सगळेच नाही पण बहुतांश व्यावसायिक स्वतःच्या संपत्ती निर्माणसाठीच व्यवसाय वृद्धी आणि व्यावहारिक सचोटी मेंटेन करत असतात. मी व्यवसायाने फायनान्शियल प्लॅनर आहे त्यामुळे Money Motivates the Most.. असा माझा अनुभव आहे. जर माझी संपत्तीच माझी राहणार नसेल तर मी मेहेनत कोणासाठी करू? माझ्या संपत्तीतून किंवा कमाईतून  काही भाग समाजकार्यासाठी देणं वेगळं आणि बळजबरीने तो हिसकावून घेणं वेगळं... यातून अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसेल, म्हणून हे व्यवहार्य नाही..


Yuvraj Tare पैसा ही एक प्रेरणा असते यावर दुमत होऊच शकत नाही. पण ती एकमेव असते असेही नाही. ती एकमेव असावी असेही नाही. दुसरे म्हणजे संपत्ती बाळगण्याची वरची मर्यादा जर असेल तर एखादी व्यक्ती तिथवर नक्की प्रयत्न करू शकेल, करेल. त्यापलीकडे नाही करणार. त्याने काय फरक पडेल? एका अंबानी ऐवजी काही हजार संपन्न लोक निर्माण होतील. कारण अमुक मर्यादेपलीकडे जर काही प्राप्त होणार नाही तर जी पोकळी राहील ती कोणीतरी भरेलच. मानवी जगण्याच्या गरजेतून होणारा तो सार्वत्रिक विकास राहील. आजच्यासारखा एकांगी आणि अनर्थकारी विकास राहणार नाही. फार तर अमुक मर्यादेहून जास्त कमावता येत नाही हा चडफडात होऊ शकेल काही लोकांचा. पण जीवन म्हणजे केवळ पैसा असा विचार करणाऱ्यांचा तो प्रश्न आहे. त्याची फिकीर केलीच पाहिजे असे नाही. पैसा हेच जीवन असं समजणाऱ्या आजच्या अर्थविचारा ऐवजी जीवनासाठी पैसा असा अर्थविचार करण्याची गरज आहे. आजच्या आर्थिक प्रश्नांची उत्तरेही त्यातच आहेत.


Shripad Kothe एक अंबानी बुडल्याने 60 लाख शेअर होल्डर पण बुडतील. हे सर्व शेअर होल्डर्स करोडपती नाहीत. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण इथे सुद्धा वेगळ्या अंगाने लागू पडते. इथे टाटांसारखे उद्योगपती सुद्धा आहेत. अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर उत्पादन व सेवा पुरवतात यांचे सुद्धा काही अधिकारी कोट्यावधी चे पॅकेज घेतात. दुसरं म्हणजे उद्योग करणाऱ्यां अनेकांची संपत्ती ही आभासी (Notional) असते. ती  त्यांच्या उद्योगाच्या तात्कालिक स्थिती आणि शेअर बाजारातील उतार चढवांवर अवलंबून असते.. खरं तर तुम्ही जे म्हणत आहात ते कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेचे मत आहे परंतु तिथेही ते लागू पडले नाही याचं उदाहरण चिनी अर्थव्यवस्था सुद्धा भांडवलवादीच आहे. पैसा ही एकमात्र प्रेरणा नाही असे आपले मत आहे परंतु दुर्दैवाने आपल्या अर्थचक्राच्या दृष्टीने तसेच आहे. सद्यस्थितीत अर्थव्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची आणि परस्परावलंबी आहे. आपण म्हणत आहात ती कदाचित आदर्श अर्थव्यवस्थेची लक्षणे असू शकतात पण सद्य स्थितीत व्यवहार्य नाही.. 


Yuvraj Tare मी आदर्श रुजवणारा माणूस आहे. कदाचित लाख वर्षांनी तसे होईल. मला फिकीरही नाही अन घाईही नाही. मी कम्युनिस्ट, भांडवलशाही, हिंदुत्व किंवा कोणत्याही head खाली वा लेबल लावून विचार करतच नाही. मी जीवनाचा मूलभूत विचार करतो आणि मांडतो. माझे कोणतेही आग्रह नाहीत. मी माणसाचा आणि समाजाचा विवेक जगवण्याचं काम तेवढं करतो. ही माझी मर्यादा मी घालून घेतलेली आहे. समाज समाजाचे पाहील. टीचभर आयुष्यात अमुक काही करून दाखवण्याची स्वप्ने वगैरे मी पाहतच नाही. मी फक्त माळरानावर बिया विखरून देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा