मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

सामाजिक स्वभाव

वय वर्षे १५ ते ६० यांच्यासाठी रोज एक तास श्रमदान सक्तीचे केले तर? वस्ती, सदनिका, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे; अशा सगळ्या ठिकाणी श्रमदान. कोणालाही कोठेही जाऊन त्या कामात सहभागी होण्याची मुभा असावी. या कामाची नोंद, त्यावर आधारित प्रमाणपत्र किंवा अन्य सवलती वगैरे गोष्टी दूरच ठेवाव्यात. हां, नोंद नाही केली तर कदाचित सक्तीचे नाही करता येणार. पण एक वातावरण तयार करून, तसे आवाहन समाजाला करायला काय हरकत आहे? यात पद, हुद्दा, व्यवसाय वगैरे काहीही आड यायला नको. १५ ते ६० वयोगटातील सगळ्या स्त्री पुरुषांनी आपणहून श्रमदान करावे. कोणी जगातला मोठा कुबेर असो, कोणी डॉक्टर असो, अभियंता असो, शिक्षक, प्राध्यापक असो, पत्रकार, लेखक असो, बँक कर्मचारी वा अधिकारी असो... अगदी कोणी म्हणजे कोणीही. एक तास श्रमदान करायचे. किती मोठे काम होऊ शकेल. शाळा, महाविद्यालये, कारखाने, कार्यालये, रेल्वे स्थानके, बसस्थानके, भाजीमंड्या, रस्ते, नद्या, घाट; सगळा देश चकाचक होऊ शकेल. कोट्यवधी वृक्षांची लागवड होऊ शकेल. कार्यालयीन धारिका (फायली), ग्रंथालये, पुस्तके सगळी नीट लावली जातील. रस्ते तयार होऊ शकतील, तलाव खोदले जाऊ शकतील, अनेक गोष्टींची डागडुजी, रखरखाव होऊ शकेल, रंगरंगोटी होऊ शकेल. अशा एक ना अनेक गोष्टी होतील. मंत्री वगैरेही त्याला अपवाद नाही. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा अपवाद नकोत. ज्या देशाचे सर्वोच्च नेते सुद्धा एक तास श्रमदान करतात असा जगातील एकमेव देश, असा लौकिक व्हायला काय हरकत आहे? मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत अमुक क्रमांकावर आहेत, पण तरीही ते रोज एक तास श्रमदान करतात; अशी जगभर चर्चा व्हायला काय हरकत आहे. अर्थात हे सहज स्वयंस्फुर्तीने व्हावे. त्याची नोंद, त्याच्या जबाबदाऱ्या वगैरे गोष्टी आल्या की सगळे बिघडून जाते. एक तास श्रमदान करणे हा आपला सामाजिक स्वभाव व्हावा. काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा