सोमवार, ११ एप्रिल, २०२२

प्रवाह

जीवन हा प्रवाह आहे. अन हा प्रवाह जन्मापासून सुरू होत नाही आणि मृत्यूशी थांबत नाही. जन्म ते मृत्यू हा त्या प्रवाहातील एक छोटासा भाग आहे. हे मान्य करायला वा पटायला धार्मिक, आध्यात्मिक, पुनर्जन्मवादी वगैरे होण्याची वा असण्याची गरज नाही. शुद्ध इहवादी, शुद्ध जडवादी, शुद्ध भौतिकवादी, शुद्ध भोगवादी व्यक्तीबाबतही हेच सत्य असते. कारण ज्याला सामान्यपणे जीवन म्हटले जाते त्याचे पोषण करणारे बहुतेक सगळेच घटक या सनातन प्रवाहातूनच मिळतात. भाषा, भूषा, भवन, भावना, खाद्यपदार्थ, ज्ञान, विज्ञान, अनुभव, जाणिवा, धारणा, गृहितके, कल्पना, सोयी, सवयी, सुरक्षा; अशा असंख्य गोष्टी जीवनाच्या या प्रवाहात सतत वाहत असतात. जन्म ते मृत्यू या टप्प्यात आपण त्यातूनच काही ना काही वेचून घेतो. वेचून घेतलेले कधी तसेच तर कधी बदलून घेतो आणि स्वतःला समृद्ध करतो. त्यातील आपल्याला जे योग्य वाटते ते आणि जे योग्य वाटत नाही तेही या प्रवाहाचं देणं असतं. परंतु जीवनाच्या या प्रवाहीपणाचं नीट आकलन नसलं तर, आपण भविष्याचा कर्ता आणि मालक होण्याचा प्रयत्न करतो किंवा भूतकाळाला नावे ठेवतो, भूतकाळाच्या चुका निश्चित करतो. मुळात आमच्या जीवनाचा जो तुकडा असतो त्या तुकड्याच्या आधारे आणि त्या संदर्भात भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे मूल्यांकन करणे, आजच्या काळाच्या फुटपट्ट्या 'काल'ला किंवा 'उद्या'ला लावणे हे फारसे समजदारीचे म्हणता येत नाही. जीवनाच्या अमूर्त घटकांनाच नव्हे तर मूर्त घटकांना सुद्धा गच्च चौकटीत बांधता येत नाही.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा