रविवार, २४ एप्रिल, २०२२

स्मशानात वाढदिवस

भंडारा डेटलाईनची एक बातमी आज वाचण्यात आली. एका तरुणाने आपला वाढदिवस मित्रांसोबत स्मशानभूमीत साजरा केला. मृत्यू जीवनाचं सत्य आहे तर असं करायला काय हरकत आहे? उलट त्याने वृत्तीचं समत्वच निर्माण होईल, असा युक्तिवाद होऊ शकतो. अन तो युक्तिवादच दाखवून देतो की, आमचे विचार आज किती गोंधळलेले आहेत. स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करायचा तर संडासात जेवायचे का नाही? उद्या कोणी महाभाग करेलही कदाचित. सगळाच वेडगळपणा. जन्म, जगणं आणि मृत्यू एकाच जीवनाचे भाग असले तरीही, अवस्था म्हणून ते वेगळेच आहेत. तांदूळ आणि भात वेगळे, कणिक आणि पोळी वेगळे. परंतु समता या शब्दाने आमच्या विचारात, वृत्तीत, भावनांमध्ये, मानसिकतेत, दृष्टीत इतका गोंधळ माजवला आहे की विचारता सोय नाही. आपण एकाच वेळी समान आणि असमान असतो. या विश्वाची रचना आणि प्रकृतिच तशी आहे. परिपक्वता, विचारीपण, आध्यात्मिकता, धर्म, नीती म्हणजे विश्वाचं हे स्वरूप समजून घेणं. म्हणूनच भगवद्गीता स्पष्टच सांगते - भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ प्रकारांनी माझी प्रकृती विभक्त आहे. प्रकृतीचे परा आणि अपरा असे दोन प्रकार आहेत. अपरा प्रकृतीत भिन्नत्व आहे, असमानता आहे आणि परा प्रकृतीत पूर्ण साम्यावस्था आहे. (अध्याय ७, श्लोक ४ आणि ५). भारतेतर विचारांनी अपरा प्रकृतिचाच विचार केला आणि त्यात साम्यावस्था पाहण्याचा, कल्पिण्याचा, आणण्याचा प्रयत्न ते करतात. त्याने साम्यावस्था तर दूरच, अनवस्था वाट्यास येते. आज ठायी ठायी त्याचे दर्शन होते. भांडाऱ्याच्या तरुणाच्या कृतीने पुन्हा एकदा ते सिद्ध झाले.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा