सोमवार, २५ एप्रिल, २०२२

शेवटची इच्छा

कधी कधी लोकांच्या पोस्ट दिसतात. माझ्या मित्रांची संख्या पाच हजार झाली आहे. त्यामुळे कृपया यापुढे मित्रविनंती स्वीकारता येणार नाही. किंवा माझा हा दुसरा अकौंट असून त्यावर मित्रविनंती पाठवावी. छान वाटतं या जगन्मित्रांबद्दल. अन एक जुना प्रसंगही आठवतो. महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते. आणि शेवटचे दिवस. एक दिवस सगळे एकत्र जमले. निरोप देणेघेणे असाच प्रकार, पण कार्यक्रम थोडा औपचारिक- म्हणजे निश्चित ठरवून. त्यात एक कार्यक्रम होता की, सगळ्यांनी एका डब्ब्यात आपली शेवटची इच्छा लिहून चिठ्ठ्या टाकायच्या. खरं तर फाशीच्या वेळी विचारली जाणारी ही गोष्ट. पण कुणाला तरी सुचलं. आता आपण भेटणार नाही, शेवटची भेट. मग शेवटची इच्छाही. तर त्या चिठ्ठ्या सगळ्यांनी टाकल्या. मग त्यांचं वाचन. मी चिठ्ठीवर लिहिलं होतं- `कुणालाही माझी आठवण राहू नये.' त्याची खूप चर्चा झाली. पुष्कळांनी गंमतही घेतली. बहुतेकांना आश्चर्यही वाटलं. मलाही आश्चर्य वाटलं. मला आश्चर्य वाटलं की, या लोकांना एवढ काय आश्चर्य वाटतंय? मित्रविनंतीच्या पोस्ट पाहताना वाटलं, आजही लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल. अन मलाही आश्चर्य वाटेल की, यांना आश्चर्य का वाटतंय? तसेही ते फार महत्वाचे नाहीच म्हणा. कारण मित्रांची संख्या कितीही वाढली तरीही लक्षात ठेवतोच कोण की, मी अशी विचित्र अखेरची इच्छा बाळगावी? शेवटची इच्छा बदलावी का गड्या?

- श्रीपाद कोठे

२६ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा