बुधवार, १३ एप्रिल, २०२२

सुविचार

एक सुविचार डोळ्यांपुढून सरकला - 'आतापर्यंत खूप चांगल्या गोष्टी खूप सांगून झाल्या आहेत. आता कृतीची गरज आहे.' मनात पहिला विचार चमकून गेला - 'वाह, लोक किती छान, वेधक, चटकदार लिहितात.' अन पाठोपाठ दुसरा विचार आला - 'किती विचार न करता लिहितात.' हो पूर्ण विचार करून मी हे म्हणतोय. कारण यात दोन गोष्टी गृहित धरल्या आहेत - १) अमुक अमुक गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी आणि २) कोणीतरी सांगतो तसे माणसाने वागायला हवे किंवा कोणी सांगतो तसे माणूस वागत असतो. ही दोन्ही गृहितके योग्य आहेत का? तर या दोन्ही गोष्टी पुष्कळशा काल्पनिक आहेत हे सहज लक्षात येते. चांगल्या गोष्टी समान्यपणे सारख्या असल्या तरीही, परिस्थिती, वेळ, गरजा, अपेक्षा, उपलब्धता, मानसिकता अशा असंख्य गोष्टी त्यावर परिणाम करत असतात. अन कोणीतरी अमुक चांगलं, अमुक वाईट वगैरे सांगितल्यावर त्यानुसार जगाने वागावे ही अपेक्षा तर फारच गमतीशीर. कोणी का वागावे दुसऱ्या कोणाच्या सांगण्याने? मुख्य म्हणजे असे प्रत्यक्षात असू शकते का? माणसे म्हणजे काय कारखान्यात बनवलेली खेळणी आहेत? प्रत्येक माणूस ही निसर्गाची अपूर्व कृती असते. तिचा हेतू, तिचे स्थान, तिची क्षमता सगळंच वेगळं असतं. हाताची पाचही बोटं सारखी असतात का? त्यामुळे चर्चा, उपदेश, संस्कार वगैरे वगैरे एका साधारण अर्थानेच घ्यावे लागतात. तसे घेतले नाही तर माणूस अवाजवी अपेक्षा करू लागतो, अनावश्यक आग्रही होतो, निराश होतो. अनेकदा सुविचारांची अशीच गत होते.

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा